औरंगाबाद: देशात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. जगभरातील ही सर्वांत मोठी लसीकरण मोहीम असणार आहे. आज सकाळी कोरोनाच्या ६४ हजार लसींचासाठा औरंगाबाद शहरात दाखल झाला. या साठ्याची जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी तपासणी केली.
पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमधून मंगळवारी लसींचे कंटेनर देशाच्या विविध भागात रवाना झाले. पुण्याहून निघालेली वॅक्सिनची गाडी सकाळी औरंगाबादेत पोहोचली. जिल्हाधिकारी यांनी पाहणी केल्यानंतर लसींचासाठा जालना, हिंगोली, परभणीकडे पाठवण्यात आला.
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी यावेळी आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राला भेट देऊन तेथील प्रशिक्षणार्थी सोबत चर्चा केली. यावेळी आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. अमोल गीते, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. शेळके आदी उपस्थित होते.