नवी दिल्लीः कोरोनाचा झपाट्याने होणारा फैलाव रोखण्यासाठी भारत सरकारने कठोर पावले उचलायला सुरूवात केली असून १३ मार्चपासून १५ एप्रिलपर्यंत जगाला भारताची दारे बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जगाच्या पाठीवरील कोणत्याही देशातील व्यक्ती भारतात येऊ शकणार नाही.
कोरोना हा दुर्धर आजार असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले आहे. जगातील अनेक देशात कोरोना विषाणु झपाट्याने फैलावत चालला आहे. भारतातही कोरोना रूग्णांची संख्या ६१ च्या वर पोहोचली आहे. त्या पार्श्वभूमीवर भारताने महिनाभर स्वतःला जगापासून वेगळे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्य आणि हवाई मंत्रालयाने या संदर्भात अधिसूचना जारी केली आहे.
भारत सरकारच्या नव्या ट्रॅव्हल ऍडव्हायझरीनुसार १३ मार्चपासून १५ एप्रिलपर्यंत कोणत्याही देशातून भारतात येणाऱ्या नागरिकांसाठी व्हिसा निलंबित करण्यात आला आहे. या काळात संयुक्त राष्ट्राशी संबंधित कर्मचारी, राजनैतिक आणि सरकारी प्रकल्पांशी संबंधित अधिकाऱ्यांनाच भारतात येण्याची मुभा असेल. ओव्हरसिज सिटिझन्स ऑफ इंडिया कार्डधारकांनाही १५ एप्रिलपर्यंत भारतात येता येणार नाही. या निर्णयामुळे कोणत्याही देशातील व्यक्तींना पर्यटन किंवा अन्य कामकाजासाठी भारतात प्रवेश मिळणार नाही. अत्यंत महत्वाचे काम असेल तर भारतीय दूतावासाकडून विशेष परवानगी काढूनच प्रवेशाची परवानगी मिळवावी लागणार आहे.