मुंबईः महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली असून आज राज्यात तीन नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या ५२ वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.
आज राज्यात नव्याने आढळलेले कोरोना बाधित रूग्ण मुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील आहेत. जे कोरोना बाधित रूग्ण आहेत, त्यापैकी पाच जणांना आज सुटी देण्यात येणार आहे. त्यांना आणखी पाच ते सात दिवस होम क्वारंटाइन राहावे लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. कोरोनाची बाधा झाल्यानंतरही रूग्ण बरा होतो, असे टोपे म्हणाले.
कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारकडून आवश्यक त्या खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. राज्यातील लोकांना गर्दी टाळून घराबाहेर न पडण्याचे आवाहनही करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर येत्या रविवारी देशभरात सकाळी सातवाजेपासून रात्री नऊ वाजेपर्यंत ‘जनता संचारबंदी’ जाहीर करण्यात आली आहे.