औरंगाबादः मला ‘हिंदू जननायक’ ही उपाधी एका वृत्तवाहिनीनं दिली आहे. हवे असल्यास त्यांना विचारा. मला हिंदू जननायक म्हणू नका,असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्यांना शुक्रवारी केले.
मनसेच्या पहिल्या राज्यव्यापी अधिवेशनात झेंड्याचा रंग बदलल्यानंतर आणि हिंदुत्वाचा मुद्दा आक्रमकपणे स्वीकारल्यानंतर राज ठाकरे सध्या ते मराठवाडा दौऱ्यावर आहेत. औरंगाबाद येथे शुक्रवारी त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या. राज ठाकरे म्हणाले की,मी भूमिका बदललेली नाही. घुसखोरांना आणि पाकिस्तानी कलाकारांना माझा पूर्वीपासून विरोध होता. उलट भूमिका बदलून अनेक जण सत्तेत आले आहेत.
मनसेकडून औरंगाबाद शहराचे नाव बदलण्याची मागणी पुढे येत आहे. यावर ठाकरे म्हणाले की , औरंगाबादचे नाव संभाजीनगर असे बदलले तर काय हरकत आहे? बदल झालेच पाहिजेत.असे म्हणत ठाकरे यांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यासाठी अनुकूलता दाखवली. भीमा-कोरेगाव प्रकरणाचा तपास होण्याशी कारण आहे. तो कुणाकडे आहे याला माझ्या दृष्टीने काही महत्त्व नाही. आपल्याकडे भेटीचे रूपांतर लगेचच मैत्रीत केले जाते.शरद पवारांशी चांगले राजकीय संबंध आहेत. मराठीला नख लावाल तर मराठी म्हणून अंगावर येईन, धर्माकडे वाकडे बघाल तर हिंदू म्हणून समोर येईन, असेही ठाकरे म्हणाले. व्हॅलेंटाइनडे कडे लक्ष देण्यापेक्षा महिलांवर अत्याचार होतात, ऍसिड फेकतात त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे ठाकरे यांनी आवाहन केले आहे.