लातूर : महाराष्ट्रात सरकार आणि मुख्यमंत्री दोन्हीही शिवसेनेचेच असणार, अशी स्पष्टोक्ती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्यामुळे भाजप- शिवसेनेमधील सत्तावाटपाचा तिढा अद्यापही कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे भाजप कोअर कमिटीच्या बैठकीनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार लवकरच स्थापन होईल, असा दावा केला असतानाच उद्धव ठाकरे यांचे हे वक्तव्य आले आहे. आपले सरकार आल्यानंतर सर्वात आधी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्तीचा निर्णय जाहीर केला जाईल, असे आश्वासनही उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.
परतीच्या पावसामुळे झालेल्या पीक नासाडीची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर आहेत. मंगळवारी त्यांना लातूर आणि नांदेड जिल्ह्यातील पिकांची पाहणी करून शेतकर्यांशी चर्चा केली. लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातील खंडाळी येथे शेतकर्यांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केले. यावेळी आम्हाला शिवसेनेचाच मुख्यमंत्री हवा, शिवसेनेचे सरकार आले तरच आम्हाला कर्जमाफी मिळेल, असा सूर शेतकऱ्यांनी लावला. त्यावर बळीराजाची इच्छा असेल तर महाराष्ट्रात आपलेच सरकार येईल आणि मुख्यमंत्रीही शिवसेनेचाच होईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे भाजप- शिवसेनेतील सत्तावाटपाचा तिढा आणखीच गुंतागुंतीचा बनल्याचे स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा : फडणवीसांच्या नेतृत्वातच सरकारवर भाजप, तर ‘जे ठरले ते लेखी द्या’च्या मागणीवर शिवसेना ठाम
[…] उद्धव ठाकरेंचा भाजपला दे धक्का : सरकार… […]