मुंबईः साईबाबांच्या जन्मस्थळावरून निर्माण झालेल्या वादावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीवर आज पडदा पडला. पाथरी हे साईबाबांचे जन्मस्थळ आहे, हे वक्तव्य मागे घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तीर्थक्षेत्र म्हणून पाथरीचा विकास करण्याचे आश्वासन दिले. शिर्डी आणि पाथरीकरांनीही त्याला संमती दिल्याने हा वाद सामोपचाराने मिटला आहे.
पाथरी हे साईबाबांचे जन्मस्थळ आहे, असा उल्लेख करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाथरीच्या विकासाच्या योजना जाहीर केल्याने वाद उफाळून आला होता. शिर्डीकरांनी या वक्तव्याच्या निषेधार्थ बंदही पुकारला होता. या वादावर चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर शिर्डीकरांनी बंद मागे घेतला होता.
साईबाबांचे जन्मस्थळ म्हणून नव्हे तर तीर्थक्षेत्र म्हणून पाथरीचा विकास होणार असेल तर आमचा कोणताही आक्षेप नाही, अशी भूमिका शिर्डीकरांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात तातडीने बोलावलेल्या बैठकीत मांडली. दोन्ही बाजूंनी या भूमिकेला मान्यता देण्यात आली. बंद पुकारण्यापूर्वी तुम्ही माझ्याशी चर्चा करायला हवी होती. आता कोणताही वाद उकरून काढू नका, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी पाथरी आणि शिर्डीच्या शिष्टमंडळाला केले आणि या वादावर पडदा पडला.