औरंगाबाद: औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांना प्रशासक म्हणून देण्यात आलेली सहा महिन्यांची मुदत संपली असून त्यांना अद्यापही मुदतवाढीचे पत्र देण्यात आलेले नाही. त्यामुळे सरकार पांडेय यांना आणखी सहा महिने मुदतवाढ देणार की औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजवणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.
एप्रिल २०२० मध्ये औरंगाबाद महापालिकेची निवडणूक होणार होती. परंतु कोरोना संसर्गामुळे ही निवडणूक लांबणीवर टाकावी लागल्याने राज्य सरकारने महापालिकेचे आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांची प्रशासक म्हणून सहा महिन्यांसाठी नियुक्ती केली होती. बुधवारी (२८ ऑक्टोबर) ही मुदत संपली आहे. मात्र अद्यापही राज्य सरकारकडून त्यांना मुदतवाढीचे पत्र प्राप्त झाले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
नियमानुसार प्रशासक फक्त सहा महिन्यांसाठी नियुक्त करता येतो. मात्र, कोरोना संसर्गाचा आपत्तीचा काळ असल्यामुळे सहा महिन्यांसाठी पांडेय यांना मुदतवाढ मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, बुधवारी रात्रीपर्यंत यासंदर्भात राज्य सरकारकडून कोणतेही पत्र पालिका प्रशासनाला प्राप्त झाले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.